Posted on Leave a comment

27th Feb: पुनरुत्थानाचे मूलगामी परिणाम

आपण ह्या आयुष्यात ख्रिस्तावर केवळ आशा ठेवणारे असलो तर मग सर्व माणसांपेक्षा
आपण लाचार आहोत. (1 करिंथ 15:19)

पौल त्याच्या दर तास अनुभवीत असलेल्या संकटावरून, आणि रोजच्या मरणावरून, आणि
वन्यपशूंसोबत त्याच्या लढ्यावरून हा निष्कर्ष काढतो की जर त्याला मरणातून जिवंत
करण्यात आले नाही, तर येशूच्या अनुसरण करण्यात ज्या जीवनाची त्याने निवड केली आहे
ती मूर्खपणाची आणि दयनीय ठरेल.

जर मृत्यू सर्व गोष्टींचा शेवट असता, तर तो म्हणतो, “चला, आपण खाऊ, पिऊ, कारण उद्या
मरावयाचे आहे” (1 करिंथ 15:32). याचा अर्थ हा नाही की : जर पुनरुत्थान नसेल तर
आपण सर्व खादाड आणि दारूडे बनू या. दारूडे सुद्धा दयनीय असतात – मग पुनरुत्थान
असो अथवा नसो. त्याच्या म्हणण्याचा अर्थ आहे : जर पुनरुत्थान नाही, तर पृथ्वीवरील
सुखांचा जास्तीत जास्त उपभोग घेण्यासाठी मध्यमवर्गीय संयमाचा काय अर्थ.

पण पौल या गोष्टीची निवड करीत नाही. तो क्लेशाची निवड करतो, कारण तो
आज्ञापालनाची निवड करतो. दमिश्काच्या मार्गावर ख्रिस्तासोबत झालेल्या त्याच्या
भेटीनंतर हनन्या पौलाकडे प्रभू येशूकडून हे शब्द घेऊन आला, “त्याला माझ्या नावासाठी
किती दुःख सोसावे लागेल हे मी त्याला दाखवीन” (प्रेषितांची कृत्ये 9:16). पौलाने त्याच्या
पाचारणाचा भाग म्हणून या दुःखाचा स्वीकार केला.

पौल हे कसे करू शकला? ह्या मूलभूत आणि दुःखदायक आज्ञापालनाचा उगम काय होता?
याचे उत्तर 1 करिंथ 15:20 मध्ये दिलेले आहे : “तरीपण ख्रिस्त मेलेल्यांतून उठवला गेला
आहेच; तो महानिद्रा घेणार्यांतले प्रथमफळ असा आहे.” दुसऱ्या शब्दांत, ख्रिस्त उठविला
गेला, आणि मी त्याच्यासोबत उठविला जाईन. म्हणून, येशूसाठी सहन केलेले कोणतेही दुःख
व्यर्थ नाही (1 करिंथ 15:58).

पुनरुत्थानाच्या आशेने पौल ज्याप्रकारे जगत होता त्यात मूलभूत बदल घडवून आणला. या
सत्याने त्याला भौतिकतावाद आणि उपभोक्तावादापासून स्वतंत्र केले. या सत्याने त्याला
सुखसोई आणि सुखविलासावाचून जगण्याचे सामर्थ्य दिले ज्याविषयी अनेक लोकांस वाटते
की या जीवनात त्यांस ते प्राप्त झाले पाहिजे. उदाहरणार्थ, जरी त्याला लग्न करण्याचा हक्क
होता (1 करिंथ 9:5), तरीही त्याने त्या सुखाचा त्याग केला कारण त्याला अतिशय दुःख
सहन करावयास पाचारण करण्यात आले होते.

येशूने म्हटले की याच प्रकारे पुनरुत्थानाच्या आशेने आमच्या वर्तनात बदल घडवून आणला
पाहिजे. उदाहरणार्थ, त्याने आम्हास सांगितले की आम्ही अशा लोकांना आपल्या घरी
आमंत्रित करावे जे या जीवनात आमची परतफेड करू शकत नाहीत. हे करण्यासाठी आम्ही
कसे प्रेरित झाले पाहिजे? “नीतिमानाच्या पुनरुत्थानसमयी तुमची फेड होईल” (लूक
14:14).

पुनरुत्थानाच्या आशेने त्यांस आकार मिळतो की नाही हे पाहण्यासाठी आपल्या सांप्रत
जीवनाकडे निक्षून पाहण्याचे हे एक मूलभूत पाचारण आहे. आपण या जगातील लाभाच्या
आधारे निर्णय घेतो का, किंवा पुढील जीवनाच्या लाभावर? पुनरुत्थान असेल तरच आम्ही
प्रेमाखातर धोका पत्करतो का हे शहाणपणाचे म्हणून समजाविता येऊ शकते?
पुनरुत्थानाचे मूलभूत परिणाम व्हावेत म्हणून आयुष्यभरासाठी आपले पुनर्समर्पण करण्यात
देव आमची मदत करो.
Leave a Reply